(नवी दिल्ली)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करत, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशासाठी हा जगासाठी मोठा धोका असल्याचे सांगितले. “भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, तर पाकिस्तानसारख्या देशाला दहशतवाद हा पर्यटन वाटतो,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले.
पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, भुज येथे विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी ₹५३,४०० कोटींच्या ३१ प्रकल्पांची पायाभरणी आणि ई-उद्घाटन करण्यात आले.
दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण
पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवादाविरोधातील आमचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. जो कोणी आमच्या देशावर रक्तपात करेल, त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल,” असा सज्जड इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.
“भारतावर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही,” असेही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी सांगितले, “हे मानवतेच्या रक्षणासाठी आणि दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी हाती घेतलेले अभियान आहे.”
पाकिस्तानला शांततेचा सल्ला, अन्यथा कारवाई
पंतप्रधान मोदींनी खुलासा केला की, “पाकिस्तान दहशतवादविरोधात काही पावले उचलते का, हे पाहण्यासाठी आम्ही १५ दिवस वाट पाहिली. पण दहशतवाद तिथे जणू खाद्यपदार्थाचा भाग बनला आहे. त्यामुळे सरकारने भारतीय लष्कराला मोकळीक दिली. भारतावर डोळा टाकणाऱ्याला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. पाकिस्तानने शांततेत राहावे, अन्यथा आमच्याकडे गोळ्या आहेतच.”
“पाकिस्तान दहशतीच्या सावलीत वाढतोय”
भुज आणि दाहोद येथील सभांमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आणि दुसरीकडे, पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट आहे. तुमच्या देशाचे सरकार आणि लष्कर दहशतवादाला पाठिंबा देत आहे. दहशतवाद हे त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन बनले आहे, जे तुमचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातील जनतेनेच पुढे येऊन बदल घडवावा, ही वेळ आहे.”
मोदी पुढे म्हणाले, “सरकारने लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवाद्यांचे अड्डे हे आमच्या लष्कराचे लक्ष्य होते आणि भारतीय जवानांनी आजूबाजूच्या परिसराचे कोणतेही नुकसान न करता हे कार्य पार पाडले. आमच्या लष्कराच्या क्षमतेमुळे पाकिस्तानच्या वायुमार्गांची अवस्था ICU मध्ये गेली आहे,” अशा शब्दांत त्यांनी भारतीय लष्कराची ताकद अधोरेखित केली.