(गुहागर /वार्ताहर)
समुद्रकिनारी खारट हवामान आणि वादळवाऱ्यामुळे वारंवार पडणाऱ्या विद्युत खांबांच्या समस्येवर उपाय म्हणून शासनाच्या धोरणानुसार कोकणातील गावांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या योजनेचा उद्देश जरी चांगला असला तरी ठेकेदारांकडून होत असलेल्या कामातील निष्काळजीपणामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गुहागर तालुक्यातील मोडकाआगर, वरवेली, पालशेत, अडूर, वेळणेश्वर, साखरीआगर, हेदवी, नरवण तसेच गुहागर-आरे-वाकी मार्गावरील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. भूमिगत वीजवाहिन्या रस्त्याच्या साईट पट्टी किंवा गटाराच्या बाहेर टाकण्याऐवजी, चक्क गटारांमधून व साईट पट्ट्यांमधून खोदकाम करून केल्या जात आहेत. त्यामुळे गटारे व साईट पट्ट्यांचे योग्य पुनरुज्जीवन न झाल्याने रस्त्यावर माती व दगडांचे थर पसरले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.
या संदर्भात उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आवाज उठवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी सांगितले की, “गेल्या ६-७ महिन्यांपासून विद्युत वाहिन्यांचे काम अनियमित पद्धतीने होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत हस्तक्षेप करून ठेकेदारांना योग्य सूचना द्यायला हव्यात होत्या. आज अवकाळी पावसामुळे रस्त्यांची परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे, आणि यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.”
सरपंच आंबेकर यांनी हेही नमूद केले की, अशा मोठ्या प्रकल्पांबाबत ग्रामपंचायतींना पूर्वसूचना न देता वरच्या स्तरावरून परवानगी दिली जाते. परिणामी ग्रामस्थ सरपंचांकडे जाब विचारतात, जेव्हा प्रत्यक्षात सरपंचांचा त्या निर्णयात सहभाग नसतो.
यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत श्री. आंबेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची पाहणी करून, दोषी ठेकेदारांकडून गटारे आणि साईट पट्ट्यांचे काम योग्य रीतीने पूर्ण करावे, अशी विनंती केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पावले त्वरित उचलली जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.