(गुहागर)
लोणावळ्याला फिरण्यासाठी गेलेल्या गुहागरमधील एका तरुणाचा, केवळ गाडी वळवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी, २५ मे रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य सात जण फरार आहेत. या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात आणि पर्यटन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. अडूर, कोंडकारुळ, गुहागर) असे आहे. ते लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शनानंतर एका फार्महाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याशी त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच झटापटीत कमलेश धोपावकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.
ही घटना घडताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन स्थानिक तरुणांना अटक करण्यात आली असून, इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याने याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.