(महाड)
महाड-दापोली मार्गावर शनिवारी झालेल्या एसटी बस अपघातानंतर अवघ्या २४ तासांच्या आत दोन अपघातांची पुनरावृत्ती झाल्याने या महामार्गावरील रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघातांमध्ये जीवितहानी टळली असली तरी पावसाळ्यात याच कारणामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ठाम सवाल शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपस्थित केला आहे.
शनिवारी दुपारी स्वारगेट एसटी डेपोची विन्हेरे-स्वारगेट बस करंजाडी येथील बुद्धवाडीजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत बसमधील १५ प्रवाशांपैकी सात प्रवासी, चालक व वाहक जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच, अवघ्या २४ तासांमध्ये शिरगावजवळील गोमंतक हॉटेलजवळ एक इको कार (एमएच ०८ एएक्स १५४२), लग्न समारंभाहून परतताना रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने, यात कोणतीही जखमी नोंदली गेली नाही.
दरम्यान, रेवताळे आंग्रेकोंड परिसरात तुडील येथील आरिफ देशमुख यांच्या मालवाहतूक टेम्पोला अपघात झाला. या दुर्घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघाताचे कारण पुन्हा एकदा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिरगाव फाटा ते लाटवण फाटा दरम्यानचा रस्ता अत्यंत निसरडा झाला असून, अवकाळी पावसात अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जर या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी जबाबदार कोण असेल? असा थेट सवाल सरपंच ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड उपविभागीय अभियंत्यांना विचारला आहे.