(मुंबई)
कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाच्या “सुरक्षित तट – समृद्ध भारत” या मोहिमेअंतर्गत आयोजित वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन 2026 चे शुक्रवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यापीठामध्ये आगमन होणार आहे. या उपक्रमामुळे कोकणात राष्ट्रभक्ती, सुरक्षा जनजागृती आणि नागरिक सहभागाला नवे बळ मिळणार आहे. ही सायक्लोथॉन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे सकाळी ठीक ९:०० वा (ध्वजप्रदर्शन/फ्लॅग ऑफ समारंभ) होणार असून ही रॅली – महाड – सोवेली गाव (दापोली) – दाभोळ – गुहागर असा प्रवास करणार आहे. लोणेरे येथे आयोजित ध्वजप्रदर्शन समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायक्लोथॉनला अधिकृत प्रारंभ करण्यात येणार आहे.
या सायक्लोथॉनमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, युवक-विद्यार्थी, महिला बचत गट तसेच मच्छीमार संघटनांचा सक्रिय सहभाग असणार आहे. “वंदे मातरम्” व “सुरक्षित तट – समृद्ध भारत” या घोषणांतून किनारपट्टी सुरक्षेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या प्रसंगी नागरिकांना किनारपट्टीवरील सतर्कता, संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती देण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन पाळत, सीसीटीव्ही व्यवस्था तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
या मोहिमेमुळे कोकणातील सुरक्षा अधिक मजबूत होण्यासोबतच पर्यटन, उद्योग आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

