(खेड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात घडला. किया कार सुमारे १०० फूट खोल नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना सोमवारच्या पहाटे सुमारे पाच ते साडेपाचच्या सुमारास घडली. मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (२२), मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९) आणि श्रेयस राजेंद्र सावंत (२३) यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त हे दोन कुटुंबातील सदस्य असून ते अंत्यविधीसाठी मुंबईहून देवरुखकडे निघाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मंडळी मिरा रोड-भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास गावी जाण्यासाठी निघाली होती. त्यांनी किया कंपनीची (MH 02 3265) कार वापरली होती. भरणे नाका येथे आल्यानंतर अचानक कारचा ताबा सुटल्याने ती थेट जगबुडी नदीतील खोल दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच खेडमधील पोलिस, महामार्ग पोलिस व स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना कारमधून बाहेर काढून त्वरित कळंबणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गंभीर जखमी असलेले परमेश पराडकर यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विवेक मोरे हे देखील गंभीर जखमी असून त्यांनाही उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघातग्रस्त पराडकर कुटुंबीय नालासोपारा येथे तर मोरे कुटुंबीय मिरा-भाईंदर परिसरात राहतात. ही दुर्घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरली आहे.
घटनास्थळी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह स्थानिक नागरिक, पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी मोठ्या तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अडकलेल्या कारला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले असून, अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात येत आहे. ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सध्या खेड पोलिसांकडून अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण कोकण हादरून गेला असून, एका अंत्यविधीसाठीचा प्रवास सातजणांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला.