(संगमेश्वर)
लाखो रुपयांचा खर्च करून सुधारण्यात आलेल्या देवरूख बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची अवस्था अवघ्या काही आठवड्यांतच बिकट झाली आहे. काही बेफिकीर प्रवाशांनी नळांची मोडतोड करत चक्क चोऱ्या केल्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरवाजांचीदेखील तोडफोड झाल्यामुळे संपूर्ण स्वच्छतागृहाचा वापर अडचणीत आला आहे.
हे स्वच्छतागृह “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत उभारण्यात आले असून, स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाची सुविधा म्हणून कार्यरत होते. मात्र, सार्वजनिक मालमत्तेकडे बेपर्वा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांच्या चुकीमुळे ही सुविधा आता अकार्यक्षम ठरत आहे.
आगार प्रशासनाने या पूर्वीही मोडलेल्या नळांच्या जागी नव्या यंत्रणा बसविल्या, परंतु पुन्हा त्याचप्रकारच्या घटना घडल्यामुळे त्यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत. या प्रकारामुळे प्रवासी वर्गामध्ये तीव्र नाराजी असून, “प्रशासन गंभीर आहे की केवळ देखावा करते?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वच्छता टिकवण्यासाठी सहकार्य करावे आणि जर कोणाचेही अनुचित वर्तन आढळल्यास त्वरित प्रशासनास कळवावे. दोषींवर कठोर पोलिस कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले असून, नागरिकांनी सजग राहून सार्वजनिक सुविधांची जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.