( पिंपरी चिंचवड )
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगल्यांवर तोडकामाची मोठी कारवाई सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळल्यामुळे हरित लवादाचा आदेश कायम ठेवण्यात आला असून, 31 मेपूर्वी ही बांधकामे हटवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.
आज सकाळपासून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरु झाली. महापालिकेच्या पथकांनी अनेक JCB आणि बुलडोझरच्या साहाय्याने तोडकामाला सुरुवात केली. ‘रिव्हर व्हिला प्रकल्पात’ एकूण 36 बंगले असून, त्यापैकी 29 रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे आता सर्व 36 बंगले हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
चिखलीतील सर्वे नंबर 90 मध्ये हा बंगला प्रकल्प उभारण्यात आला होता, जो इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात येतो. या बांधकामांमुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह व पर्यावरण धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच, पर्यावरण संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियमाच्या तरतुदींनाही हे बांधकाम मूळतः बाधक ठरत होते.
महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, बेकायदेशीर बांधकामांना कोणतीही माफकता दिली जाणार नाही, आणि प्रशासन न्यायालयीन आदेशाची कडक अंमलबजावणी करेल.