(नाशिक / प्रतिनिधी)
समाजाला आज मूल्यसंस्काराची खरी गरज असून श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे जाज्वल्य राष्ट्राभिमानी,देशाभिमानी, समर्थ, सशक्त आणि सुसंस्कारित पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते असे उद्बोधक विचार सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी मांडले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये आज (शनिवारी, १७ मे) राष्ट्ररक्षणासाठी सामुदायिक श्रीमद् गुरुचरित्र पारायण घेण्यात आले. राष्ट्र सेवेसाठी घेण्यात आलेल्या या पारायणाला ९०० सेवेकऱ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज झाले.
ते म्हणाले की, मध्यंतरी दुर्दैवी घटना घडली आणि सारे देश बांधव शत्रू पक्षाला जन्माची अद्दल घडवा असे एका सुरात आक्रमकपणे सांगू लागले. ही राष्ट्रभक्ती, हा देशाभिमान संस्कारातून निर्माण होतो असे सांगताना स्वामी सेवामार्गातर्फे राष्ट्र,धर्म आणि समाजासाठीच बहुविध उपक्रम राबवले जातात असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले. आपल्या हितगुजामध्ये त्यांनी मूल्यसंस्काराचे महत्व अधोरेखित केले. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर रानभेंडीची, सप्तरंगीची मुळी, वेखंड आणि नारळाच्या शेंड्या यांचा आयुर्वेदिक उपयोग सांगितला. त्याचबरोबर पथ्य म्हणून वांगे, मिरची, उडीद, मका हे पदार्थ वर्ज्य करा असा सल्ला दिला. आजच्या राष्ट्र रक्षणासाठी घेण्यात आलेल्या गुरुचरित्र पारायणात सहभागी झालेले सारे सेवेकरी भाग्यवान असून त्यांना श्री दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा आशीर्वाद लाभेल असे त्यांनी नमूद केले.
सिंदखेडराजा येथे २० मे ला महिला मेळावा
राजमाता जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे २० मे २०२५ रोजी महिला सक्षमीकरण मेळावा, राष्ट्ररक्षणासाठी श्री दुर्गा सप्तशती पठण तसेच स्वयंरोजगार मेळावा आणि वधू- वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी गुरुआज्ञा त्यांनी केली.
नाशिकमध्ये ३१ मे ला गंगापूजन
देशात सुवृष्टी होऊन अन्नधान्य मुबलक पिकावे, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, बळीराजा सुखी व्हावा आणि साऱ्या जनतेचे कल्याण व्हावे यासाठी नाशिकच्या रामकुंडावर ३१ मे २०२५ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत गंगापूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
२७ जूनपासून भागवत सप्ताह
भगवान श्रीकृष्णाची पुण्यभूमी असलेल्या मथुरेमध्ये २७ जून ते ४जुलै २०२५ या काळात श्रीमद् भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ही सेवा राष्ट्र कल्याणासाठी आहे. तरी या सेवेत जास्तीत जास्त सेवेकर्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरुपुत्र श्री चंद्रकांतदादा मोरे, श्री नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.