(नवी दिल्ली)
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर निर्णायक प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दहशतवादाविरोधातील भारत सरकारची ठाम भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून आम्हाला कारवाई थांबवण्याची विनंती करण्यात आली. त्या विनंतीनंतर भारतीय सैन्याने पुढील कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान म्हणाले, “भारताने निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, ही फक्त कारवाईची तात्पुरती विश्रांती आहे. भविष्यात पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी कृतीकडे आम्ही गंभीरपणे पाहणार आहोत. भारतीय सैन्य तीनही दलांसह पूर्णपणे सतर्क राहणार आहे.”
या कारवाईने दहशतवादाविरोधातील लढाईला एक नवे परिमाण मिळाले आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास, त्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल, हे या कारवाईने स्पष्ट केले आहे. कोणत्याही अणु हल्ल्याच्या धमक्या भारत सहन करणार नाही, असेही पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही दहशतवाद पोसणाऱ्या सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये कुठलाही फरक करणार नाही. यापुढे कोणतीही दहशतवादी कृती सहन केली जाणार नाही.”
आता दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि व्यापार सोबत चालणार नाही, तसेच पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही. यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावरच होणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही. उलट त्यांच्यावर जोरदार कारवाई केली जाईल, असाही इशारा मोदी यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आले आहे, थांबविलेले नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबविले नाही तर भारत पूर्ण शक्तीने हल्ला करेल, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.
पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगापुढे हेही नमूद केले की, भारताने ठार केलेल्या दहशतवाद्यांच्या जनाजांमध्ये पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. हेच सरकारपुरस्कृत दहशतवादाचे स्पष्ट उदाहरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ प्रमुख दहशतवादी तळांवर हल्ले करत त्यांना उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांत सुमारे १०० दहशतवादी ठार करण्यात आले. बहावलपूर, मुरीदके यांसारख्या प्रमुख दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हवाई कारवायांमुळे दहशतवादाला मोठा हादरा बसला आहे.
ऑपरेशन सिंदूरध्ये भारताच्या मेड इन इंडिया संरक्षण शस्त्रास्त्रांची क्षमता पाहिली. आपली एकता आपली मोठी शक्ती आहे. हे युग जसे युद्धाचे नाही, तसे हे युग दहशतवादाचेही नाही. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार ज्याप्रकाने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, एक दिवस ते पाकिस्तानचा समूळ नाश करतील. पाकिस्तानला जर वाचायचे असेल तर त्यांना दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल. टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड एकसाथ चालणार नाही, तसेच पाणी आणि खून एक एकत्र वाहू शकत नाही, असा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ठणकावून सांगितले.