( पणजी / सुरेश सप्रे)
गोव्यासह कोकणला जोडणारा कोल्हापूर–वैभववाडी कोकण रेल्वे प्रकल्प व कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ लवकरच व्हावे यासाठी गोवा व महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर–वैभववाडी कोकण रेल्वे प्रकल्प व कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे हे महाराष्ट्र, गोवा आणि कोकण विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकण-गोवा दरम्यान सुलभ, जलद व पर्यावरणपूरक रेल्वे संपर्क निर्माण होईल. पर्यटन, व्यापार, शेती, मच्छीमारी व स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळेल. हा प्रकल्प म्हणजे एक पायाभूत सुविधा नसून, प्रगतीचा नवा दुवा आहे.
त्याचबरोबर, कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्र न्यायपीठ स्थापन व्हावे, ही मागणी कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील जनतेकडून मागील चार दशकांपासून सातत्याने होत आहे. न्यायासाठी मुंबईपर्यंत प्रवास करणे मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे सत्र न्यायपीठाची स्थापना ही न्यायसुलभतेसाठी अत्यावश्यक आहे.
विकास व न्यायाच्या दृष्टीने, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मागण्या केंद्र सरकारकडे शिफारस करून सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केली असुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे ..