(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास एक मोठा अपघात घडला. जयगडमधून मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या कोळसा वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड ट्रक (क्र. MP-09-HH-2054) ला ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या डोंगराच्या कठड्यावर जाऊन आदळले आणि त्यानंतर भीषण आग लागली. या घटनेमुळे काही काळ परिसरात मोठा गोंधळ उडाला.
अपघात घडताच देवरुखहून प्रवास करत असलेल्या ओंकार सावंत व सुयोग सावंत यांच्या लक्षात ही दुर्घटना आली. त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ बस थांबवून घटनास्थळी धाव घेतली. ओंकार सावंत यांनी त्वरित रत्नागिरी MIDC अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यांच्या त्वरित सूचनेवरून अधिकारी विवेक राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वेळात घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. या दरम्यान गावकरी रमित सावंत, अनिकेत सावंत, राजू निवलकर, संतोष मेस्त्री आणि इतर ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात मोलाचे योगदान दिले.
….मोठा अनर्थ टळला
या अपघातात ट्रक क्लिनर प्रकाश बुधिया चौहान (वय ३८) किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. ट्रकचा चालक अकबर जाफर अली (वय २८) सुखरूप आहे. हा अपघात गंभीर असूनही सावंत बंधूंनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला, हे विशेष उल्लेखनीय आहे.