(रत्नागिरी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन जि. प. समाज कल्याण सभापती ॲड सुयोग कांबळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कुवारबाव येथे आज सामाजिक न्याय सप्ताहाचे शुभारंभ समाज कल्याण सभापती ॲड कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्र. सहाय्यक संचालक अपुर्वा कारंडे, महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आरेनवरु, शामराव पेजे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल आदी उपस्थित होते.
समाज कल्याण सभापती ॲड कांबळे म्हणाले, अनूसुचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 8 ते 14 एप्रिल या कालावधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याणचे जि.प. सभापती ॲड कांबळे यांनी केले.
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री घाटे यांनी प्रास्ताविकामध्ये 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि ‘सामाजिक समता सप्ताह’ चा उद्देश सांगितला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशिष कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली बाईत यांनी केले.

