(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबापासून ते अगदी मिऱ्यापर्यंत विविध भागांतील रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या महाप्रदर्शनात बदलले आहेत. महामार्गाचे काम सुरू असले तरी ठेकेदार ‘रवी इन्फ्रा’ कंपनीकडून नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जात आहे. पावसाआधीच निर्माण झालेले हे टणक खड्डे वाहनचालकांच्या मणक्यांना अक्षरशः दणका देत आहेत. त्यातच धुळीच्या ढगांमुळे नागरिक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खोदकाम चालू असतानाही रस्त्यावर पाणी मारण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे धुळीचा भडका उडत असून, दुकानदार, पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे सर्व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असा सवाल उपस्थित होऊन रवी इन्फ्रा कंपनीची बेफिकिरी आणि कामातील असंवेदनशीलता ठळकपणे जाणवत आहे.
साळवी स्टॉपसह इतर मुख्य रस्त्यांवरही खड्ड्यांचा कहर आहे. रस्त्यांवरील खडी आणि माती यामुळे वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ते रुंद असले तरी ते खड्यांनी भरलेले असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. मातीचे खड्डे पाणी मारल्यानंतर आणखी टणक बनतात व या खड्ड्यांची खोली देखील वाढत जाते. रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे चक्क आपल्या आरोग्याशी आणि वाहनाच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. प्रचंड खड्डे, उखडलेली खडी, टणक माती आणि धुळीचे लोट, हेच जर रस्त्याचे नवे मापदंड असतील, तर आपण शहरात राहतो की संकटाच्या कुशीत? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनांचे निलंबक (suspension), चाके, आणि इंजिन यांचे अक्षरशः तुकडे होत आहेत. दुरुस्तीचे बिल वाढतेय, पण जबाबदार कोण? शिवाय, अशा रस्त्यांवरून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मणक्यांना बसणारे दणके आता थेट शारीरिक आजारांचे रूप घेत आहेत. सायटिका, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या तक्रारी वाढत आहेत. रस्ते विकासाच्या नावाखाली खणून ठेवले, पण नियोजन कुठं? ठेकेदारांने आपली जबाबदारी कागदावरच ठेवली आहे का? असा ही प्रश्न आता निर्माण होत आहे.
विकासाची किंमत लोकांच्या त्रासात
विकासकामे सुरू असल्याचा हवाला दिला जात असला, तरी यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या प्रचंड वाढल्या आहेत. कामाच्या दर्जाबाबत आणि नियोजनाच्या अभावाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. विकासकामे म्हणजे सुधारणा होण्याऐवजी लोकांच्या त्रासाचे कारण बनली आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया महामार्गलगत राहणाऱ्या स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.