(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील चांदसुर्या परिसरासह पानवळ, खेडशी, कारवांचीवाडी रेल्वे स्टेशन, डीमार्टसमोरील डायवर्जन भागांमध्ये सध्या अक्षरशः खड्ड्यांचा रस्ता झाला असून प्रवाशांचे हाल सुरू आहेत. पावसामुळे आधीच परिस्थिती बिकट असताना, रस्त्यात टाकलेली माती उखडून चिखल तयार होत असून अपघाताचे गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
या मार्गिकांवरील डांबरीकरण अपुरे राहिलेले असून काही ठिकाणी फक्त GSB (ग्रॅन्युलर सब-बेस) थर टाकून काम अर्धवट सोडले आहे. या थरावरून वाहने चालवणे म्हणजे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पानवळ, खेडशी, कारवांचीवाडी रेल्वे स्टेशन, कुवारबाव, जे के फाईल या भागात डायव्हर्जन करून वाहतूक वळवण्यात आलेली असून, त्याच ठिकाणी चिखल, खडी आणि खड्ड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे.
सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दररोज पाहणी करून उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असताना, महामार्ग प्राधिकरणाचे नियुक्त केलेले प्रतिनिधी गायबच असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या पाहणी दौऱ्यांमध्ये हजेरी लावणारे अधिकारी आता कुठे आहेत? असा प्रश्न प्रवासी आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
कधी थांबणार प्रवाशांचा हा जीवघेणा प्रवास?
ज्या भागांतील काँक्रिट मार्गिका पूर्ण झाल्या आहेत, त्या भागांव्यतिरिक्त इतर भागातील रस्ते मात्र अधिकच धोकादायक बनत आहे. रात्रीच्या अंधारात या रस्त्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांच्या भागातून वाहनांची घसरगुंडी सुरूच आहे.
लोकप्रतिनिधींनीही घेतलेले मौन सोडावे!
या परिस्थितीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि ठेकेदार कंपनीने तातडीने योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनीही मौन सोडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.