(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ‘कामधेनू’ म्हणून ओळखली जाणारी शिक्षक बँक सध्या सत्तासंघर्षाच्या लाटेत सापडली आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून १६ पैकी तब्बल ११ संचालकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. यासंदर्भातील पत्र सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले असून, ९ मे रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘गुरुजींची बँक’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या बँकेत वादाची मालिका काही थांबायला तयार नाही. सत्तांतर, अंतर्गत संघर्ष आणि कारभारातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून ही बँक नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. सध्या बँकेवर महापरिवर्तन पॅनेलची सत्ता असून, दीड वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत या पॅनेलचे ९ आणि महायुतीचे ७ असे १६ संचालक निवडून आले होते. महापरिवर्तनचे संतोष कदम हे अध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, आता त्यांच्या कार्यशैलीवरच त्यांच्या सहकाऱ्यांनीच बोट ठेवले आहे.
संतोष कदम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे की, ते मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत, सहसंचालकांना विश्वासात घेत नाहीत या पार्श्वभूमीवर महापरिवर्तनमधील ४ संचालकांनी थेट महायुतीच्या ७ संचालकांशी हातमिळवणी करत अध्यक्षांविरोधात बंड पुकारले आहे. त्यानंतर ११ संचालकांच्या सह्या असलेले अविश्वासाचे पत्र सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले.
संतोष कदम यांच्या बाजूने सध्या फक्त ४ संचालक असल्याने त्यांचा पाय घरातूनच खेचला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ९ मे रोजी दुपारी १२ वाजता आयोजित विशेष सभेत या अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब होणार असून, अध्यक्षपदाचे भवितव्य त्याच दिवशी ठरणार आहे.
शिक्षक वर्गासाठी अत्यंत जिव्हाळ्याची असलेली ही बँक सध्या राजकारणाच्या लाटेत सापडली आहे. संघटनेतील फुटीमुळे संतोष कदम यांची खुर्ची डळमळीत झाली असून, ‘महापरिवर्तन’ पॅनेलच्या अंतर्गत कुरघोडीमुळे कोण गड्या आपला, कोण परका, हेच ओळखणं कठीण झालं आहे. या वादाच्या नाट्यमय शेवटाची उत्सुकता आता ९ मेच्या विशेष सभेकडे लागून राहिली आहे.