(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या प्रस्तावित उड्डाणपुलास विरोध करत काळबादेवी ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यालगत रस्ता काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे. यासाठी ६०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन काळबादेवी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांकडे सादर केले.
काळबादेवी खाडीवर उड्डाणपूल उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव असून त्यासाठी माती परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. या परीक्षणाला ग्रामस्थांचा विरोध नसला, तरी पूल नको, किनाऱ्यालगत मार्ग हवा ही ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे. काळबादेवी संघर्ष समितीच्या अध्यक्ष मधुरा आरेकर, ॲड. अविनाश शेट्ये, सरपंच तृप्ती पाटील, माजी सरपंच पृथ्वीराज मयेकर, सदस्य प्रिया मयेकर आदींच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि प्रांताधिकारी जीवन देसाई यांची भेट घेतली. “काळबादेवीतून जाणारा सागरी मार्ग आम्हाला मान्य आहे. मात्र हा मार्ग गावाच्या पर्यावरण व पर्यटनदृष्ट्या हिताचा असावा, अशी आमची भूमिका आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
किनाऱ्याचे संरक्षण, रोजगाराची संधी…
ग्रामस्थांच्या मते, समुद्राच्या वाढत्या पाण्यामुळे किनारपट्टीवर धूप होत असून भविष्यात किनारा गिळंकृत होण्याची भीती आहे. अशा स्थितीत समुद्राला लागून रस्ता गेल्यास तो बंधाऱ्याचेही काम करेल आणि काळबादेवी गावाचे संरक्षण होईल. त्याचबरोबर उड्डाणपूल झाल्यास पर्यटक गावाच्या संपर्कात न येता बाहेरच्या बाहेर निघून जातील. त्यामुळे गावात पर्यटनपूरक व्यवसाय, न्याहारी-निवास केंद्रे उभी राहण्याची संधी गमावली जाईल, अशी ग्रामस्थांची भावना आहे. “गाव वाचवला, तरच पर्यटन होईल. आणि पर्यटन वाढले, तरच रोजगार मिळेल,” असा साधा हिशेब ग्रामस्थ मांडत आहेत. त्यामुळे शासनाने उड्डाणपूल हटवून, किनाऱ्यालगत सागरी महामार्ग नेण्याचा विचार करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.