(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगतच्या मिरजोळे भागातील २६ वर्षीय भक्ती मयेकर हत्याकांडातील तिघा संशयितांची पोलीस कोठडी न्यायालयाने वाढवली आहे. सोमवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये भक्तीचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (२५, वाटद-खंडाळा), विश्वास विजय पवार (४१, कळझोंडी) आणि सुशांत शांताराम नरळकर (४०, आदर्शनगर, वाटद-खंडाळा) यांचा समावेश आहे. तपासात आणखी धागेदोरे शोधण्याची आवश्यकता असल्याने कोठडीवाढ मागण्यात आली होती.
दरम्यान, राकेश जंगम खूनप्रकरणातील आरोपी निलेश भिंगर्डे याला जयगड पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांनी निलेशच्या मदतीने ६ जून २०२४ रोजी राकेशचा खून केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर सांगली येथून निलेशला अटक करण्यात आली.
भक्ती हत्याकांडातील आरोपी दुर्वास पाटील व विश्वास पवार यांची सध्याची कोठडी संपल्यानंतर जयगड पोलिस त्यांना राकेश जंगम खून प्रकरणातही अटक करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या संपूर्ण रक्तरंजित मालिकेत महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. आरोपी दुर्वास पाटीलचे वडील आणि सायली बारचे चालक दर्शन पाटील यांची भूमिका नेमकी काय होती? भक्ती मयेकर खूनाच्या आधी झालेल्या दोन प्रकरणांतही त्यांची छाया असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी सुरू असली तरी, त्यांना औपचारिकपणे आरोपी करण्यात येणार का, की चौकशी करूनच सोडून दिले जाणार हा प्रश्न अद्याप कायम आहे.

