(रत्नागिरी)
रत्नागिरी परिसरात आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने धुवाधार हजेरी लावत उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा दिला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या जनतेला थोडेसे समाधान मिळाले आहे.
मात्र या अवकाळी पावसामुळे कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच कमी उत्पादनामुळे व्यापारी आणि शेतकरी अडचणीत असताना, या पावसामुळे तयार आंब्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडांवरचे आंबे गळून पडले असून, काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडांनाही धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाकडून यापुढील काही दिवस कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
पावसाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज वितरण कंपनीने लाईन बंद केली. वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची झोपमोड झाली. आज पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे.