(सातारा )
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आनंद लुटण्यासाठी आजोळ गाठलेली भाचीचा मामाच्या डोळ्यादेखतच पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील कण्हेर धरण परिसरात रविवारी दुपारी घडली. मृत मुलीचे नाव आराध्या अवधूत कोरडे (वय १०, रा. इस्लामपूर, जि. सांगली) असे असून, या घटनेची नोंद सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आराध्या ही चार दिवसांपूर्वीच आपल्या आजोळी – कोंडवे (ता. सातारा) येथे मामा विशाल साळुंखे यांच्याकडे आली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घ्यावा, म्हणून मामा-भाची व काही नातेवाईकांनी रविवारी सकाळी कण्हेर धरण परिसरात सहलीचा बेत आखला. धरण परिसरात पोहण्यासाठी दोघं जलाशयात उतरले. धरणाकाठी खेळता खेळता अचानक तोल जाऊन आराध्या पाण्यात बुडाली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना अचानक खोल गेलेल्या पाण्यामुळे आराध्या गटांगळ्या खाऊ लागली. मामाने आराध्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पाण्याच्या जोरामुळे तो अपयशी ठरला आणि भाचीच्या डोळ्यादेखतच ती पाण्यात बुडाली.
आपली भाची पाण्यात गायब झाल्यानंतर हवालदिल झालेल्या मामाने आणि उपस्थित लोकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण आराध्या कुठेच दिसून आली नाही. अखेर स्थानिक बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यांच्या मदतीने सुमारे तासाभरानंतर आराध्याला जलाशयातून बाहेर काढण्यात आलं आणि तिला तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं.
१० वर्षांच्या चिमुकलीचा असा अचानक मृत्यू झाल्यानं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आराध्या ही मूळची इस्लामपूरची असून ती इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. शाळेस उन्हाळी सुट्ट्या लागल्याने ती कोंडवे ता. सातारा येथे मामाच्या गावी आलेली होती. लहान वयातच तिची झालेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे वडील एसटी ड्रायव्हर आहेत.