(संगमेश्वर / एजाज पटेल)
लग्न म्हटले की जेवणाची पंगत, बसायला पाट, पाटावर ताट, ताटात 2-3 वाट्या, पाटाभोवती सुरेख सुंदर रांगोळी व त्यासोबत सुग्रास अन्नाचा सुगंध पंगतभर दरवळत असे, अशातच जेवणापूर्वी अगरबत्ती, आग्रह या सर्व गोष्टी बाद झाल्यागत आहेत. आता बसून नव्हे तर उभ्याने जेवणाची बुफे पद्धत आली. त्यामुळे लग्नसमारंभातून पंगत हद्दपार होत असून, अन्नाची नासाडी होत आहे.
बुफेच्या या युगात स्वतः ताट नव्हे डिश घ्या, स्वतःच्या हाताने वाढून घ्या आणि खा, अशी पद्धत रूढ झाली आहे. समजा पंगत असलीच तर पाटाची नाही टेबल खुर्चीची असते. भाड्याचे वाढपी पदार्थाच्या नावाचा पुकारा करीत वाढतात. आता सर्वांना सवय झालेली आहे. मित्राशी गप्पा मारता मारता मनपसंत व हवे ते पदार्थ पोटभर खाता येतात. त्यामुळे आता पंगती इतिहास जमा झाल्या आहेत. तसेच बल्लवाचार्य आचारी जमा झाले आहेत. त्याची जागा आता कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांनी घेतली आहे. अन्नाची नासाडी टाळण्याच्या हेतूने बुफे पद्धतीचा अवलंब सुरू झाला खरा. परंतु रांगेत उभे राहून अन्नपदार्थ घेणे,अवघडल्या स्थितीत खाणे, वारंवार पदार्थ घेण्यासाठी जाणे किंवा उठावे लागू नये म्हणून भरपूर अन्न वाढून घेतले जाते, येथेच अन्नाची नासाडी टाळण्याच्या हेतूला हरताळ फासल्या जात आहे.
गर्दी, गोंधळ, गैरशिस्त यामुळे भोजनाचा आस्वाद घेता येत नाही. पंगत भोजनात खाणाऱ्याला हवे तेच आणि हवे तेवढेच वाढले जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी टळते तसेच लोकांना भोजनाचा मनसोक्त आस्वाद व आनंद घेता येतो म्हणूनच पंगत भोजनाला पर्याय नाही. मात्र, पंगतीची परंपरा मोडीत निघत आता बुफेमुळे अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे जेवणाच्या पंगतीची पद्धत सर्वदूर पुन्हा सुरू झाली तर अन्न नासाडी थांबविणे शक्य होईल.
भोजन संस्कारांचा झाला विसर
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नाचा नेहमी सन्मान व्हायला हवा. अन्नग्रहण व भोजनाचा संस्कार स्वस्थ चित्त व स्वस्थ बैठकीने व्हावा असे शास्त्र सांगते. भोजन संस्कार शारीरिक व मानसिक आरोग्याला निश्चितच पोषक ठरतो, म्हणूनच पंगत भोजनाला विशेष महत्त्व आहे. सध्याच्या काळात लग्न समारंभात मात्र भोजन संस्काराचा विसर पडला आहे.