(पनवेल)
पनवेलहून रायगडला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा अभयारण्य मधील घाटात खासगी बस उलटली. ३५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा रविवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात झाला. घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस घाटात उलटली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर पनवेलमधील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात एका चिमुकलीचा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला. घाटात तीव्र वळण असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथणिक माहिती समोर आली आहे. बस उटल्याचे कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात जखमी झालेल्यांना कामोठे येथील एमजीएम रूग्णालसात उपचारांसाठी भर्ती करण्यात आले आहे.
खासगी बस मुंबईहून कोकणात प्रवासी घेऊन जात होती. कर्नाळा जवळ बस उलटल्याने अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले. अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असल्याने दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. या बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते, त्यामधील १९ जण जखमी झाले आहेत. ३ जणांचा मृत्यू झालाय. त्यामधील एकाचे नाव अमोल तलवलेकर (वय अंदाजे ३०-३२ वर्षे)असे आहे. तर एका लहान मुलीचा पाय पत्र्याने कापला गेला असून तिच्या वर एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. या अपघाताबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.