सध्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० मे निश्चित करण्यात आली आहे. यंदा डी.एड, बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात असलेल्या उमेदवारांना पात्रतेबाबत संभ्रम होता. मात्र, आता या अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्रात शिकत असलेले तसेच अंतिम परीक्षेला बसलेले उमेदवारही TAIT परीक्षेस पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही विद्यापीठांचे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस लागण्याची शक्यता आहे. यामुळे निकालाअभावी अनेक विद्यार्थ्यांना अगोदर परीक्षेतून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तथापि, या उमेदवारांचे TAIT परीक्षेतील गुण तत्काळ जाहीर करण्यात येणार नाहीत. त्यांचा निकाल तात्पुरता राखून ठेवण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी अंतिम परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक उत्तीर्ण दिनांकापासून एका महिन्याच्या आत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करणे बंधनकारक आहे. जर उमेदवार ठराविक वेळेत गुणपत्रक सादर करण्यात अयशस्वी ठरला, तर त्याचा TAIT परीक्षेतील निकाल शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. पात्रतेचे दस्तऐवज सादर केल्यानंतरच संबंधित उमेदवाराचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, अशी तरतूद या निर्णयात समाविष्ट करण्यात आली आहे.