( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर रविवारी पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड होऊन संस्थेच्या नव्या नेतृत्वाला एकमताने पाठिंबा मिळाला. अध्यक्षपदासाठी ॲड. रत्नदीप चाचले आणि उपाध्यक्षपदासाठी ॲड. शशिकांत सुतार यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंबेकर यांच्या अध्यक्षतेखालील या पहिल्या सभेत विविध मतदारसंघांतील नवनिर्वाचित संचालक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. अध्यक्षपदासाठी ॲड. रत्नदीप चाचले यांचे नाव ॲड. प्रथमेश रजपूत यांनी सुचवले व ॲड. सचिन पारकर यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी ॲड. शशिकांत सुतार यांचे नाव ॲड. मिलिंद जाडकर यांनी मांडले व ॲड. शिवराज जाधव यांनी अनुमोदन दिले. कोणतीही विरोधी उमेदवारी न आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
नवनिर्वाचित संचालक मंडळ :
ॲड. मिलिंद जाडकर (खेड), ॲड. प्रथमेश भोसले (दापोली), ॲड. दीपा रसाळ (चिपळूण), ॲड. राहुल चाचे (गुहागर), ॲड. सचिन पारकर (बेणी, रत्नागिरी), ॲड. रत्नदीप चाचले (नाचणे, रत्नागिरी), ॲड. सुरज बने (रत्नागिरी मुख्यालय), अॅड. निनाद शिंदे (रत्नागिरी मुख्यालय), ॲड. अल्तमश झारी (रत्नागिरी मुख्यालय), ॲड. शशिकांत सुतार (राजापूर), ॲड. गौरी देसाई (महिला मतदारसंघ), ॲड. कार्तिकी शिंदे (महिला मतदारसंघ), ॲड. प्रथमेश रजपूत (भटक्या विमुक्त जाती व जमाती), ॲड. प्रसाद कुवेस्कर (इतर मागासवर्ग), ॲड. शिवराज जाधव (अनुसूचित जाती-जमाती).
रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी सहकारामध्ये परस्पर विश्वास व पारदर्शकता अत्यंत आवश्यक असून, संस्थेचा विकास हा संचालक मंडळ व सभासदांमधील परस्पर विश्वासार्हतेवरच अवलंबून असल्याचे ठामपणे सांगितले. “सहकार क्षेत्र म्हणजे नुसती संस्था चालवणे नव्हे, तर एकमेकांवर विश्वास ठेवून समाजघटकांची आर्थिक उन्नती साधणे हे त्याचे खरे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.
खेडचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद जाडकर यांनी सहकारात प्रत्येक संचालकाची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकत संस्थेसाठी तात्काळ एक लाख रुपयांची मुदत ठेव जाहीर केली. उपाध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी राजापूर अर्बन बँकेतून मिळालेल्या सहकारी अनुभवाचे उदाहरण देत, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान देण्याची तयारी व्यक्त केली.
नवीन अध्यक्ष ॲड. रत्नदीप चाचले यांनी वकिलांसाठी उपयुक्त योजना राबवून त्यांची आर्थिक सक्षमता वाढवण्याची आणि संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्याची ग्वाही दिली. प्रत्येक वकिलापर्यंत सुविधा आणि सहकार्य पोहोचवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. ॲड. अविनाश ऊर्फ भाऊराव शेट्ये यांनी ही संस्था ही फक्त आर्थिक व्यवहारासाठी नसून वकिलांना न्यायालयीन सेवेसाठी आधार देणारी संस्था आहे, यावर भर दिला. कार्यक्रमाचा समारोप करताना ॲड. शिवराज जाधव यांनी आभार मानले.