(नवी दिल्ली)
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांची मोठी मोहीम सुरू झाली आहे. मंगळवारी पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कर अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
बुधवारी संध्याकाळपासून कुलगाम जिल्ह्यातील तनमार्ग भागात TRF चा वरिष्ठ कमांडर लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे मोहिम राबवत परिसराला वेढा दिला आहे. सध्या त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. या चकमकीपूर्वी सकाळी बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा हस्तगत केला.
टीआरएफने पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून, संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कुलगाममधील कारवाईकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.