(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आनंद साधना शिबीर दि. १८ ते २० एप्रिल २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर, पावस येथे संपन्न झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतिशजी शेवडे आणि श्री. जयंतराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदसाधना शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
दि. १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता शिबिराचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी शिबिराच्या आयोजनाचा उद्देश आपल्या मार्गदर्शनातून मांडला. दैनंदिन जीवनात येणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन विविध प्रकारच्या साधनांच्याद्वारे शक्य असते. तणाव व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, ते झाले तर आपण आपले दैनंदिन काम व्यवस्थित करू शकतो, असे ते म्हणाले.
या शिबिरामध्ये सकाळी लवकरच योगासने, प्राणायाम, योगनिद्रा, त्यानंतर गटचर्चा, भूमिका सादरीकरण, व्याख्यान अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्यक्तीच्या वर्तनातून सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारचे गुण अभिव्यक्त होतात हे सांगताना शिक्षणातून तामसिक गुण कसे प्रकट होतात यावर चर्चा करण्यात आली. तमोगुणांचा विद्यार्थी आणि सहकारी यांच्यावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकला गेला. शरीर आणि मन यांच्या जागरूकतेच्या आधारे हे गुण कसे बदलता येतील यासाठी साधनेची आवश्यकता साधन व्यक्तींनी अधोरेखित केली.
दैनंदिन कामातील परनिंदा, गॉसिप तामसिकच असते. न्यून आणि अहंकार नकारात्मकच असतात त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. त्यासाठी शरीरबल, मनोबल आणि आत्मबल यांचे महत्व शिबिरातील वक्त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अडाटीया आणि सुषमा वाटवे यांनी अनुक्रमे शरीर आणि मन यांच्या एकाग्रतेवर प्रकाश टाकला. अपेक्षित यश नाही मिळाले की माणूस निराश होतो अशावेळी नामस्मरण आवश्यक असते कारण ते मनाला बळकटी देते. ध्यान ही प्रक्रिया आहे ते शरीर स्थिर ठेवते आणि शरीर मनाशी तादात्म्य पावते यामधून तणाव व्यवस्थापन शक्य होते असा सारभूत विचार वक्त्यांनी मांडला.
वेगळ्या सूत्रविषयांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केलेल्या गटचर्चा खूपच प्रभावी ठरल्या. आपल्या सहकाऱ्यामधील चांगल्या गुणांची यादी सहभागींना आत्मपरीक्षण करायला लावणारी आणि मन मोकळे करणारी होती. शेवटच्या दिवशी तीन दिवसीय उपक्रमावर आधारित व्याख्यानात सुख आणि आनंद यांच्यातील फरक शिबिरार्थीसमोर मांडला. श्रीखंडाची गोळी खायला देत ती कशी क्षणात विरघळणारी अल्प सुख देणारी असते याचा अनुभव देत ध्यान, जप हे सुरुवातीला विषासारखे वाटणारे नंतरमात्र अमृताचा अनुभव देणारे आणि दीर्घ काळाची गुंतवणूक असते. कशावरही अवलंबून नसणारा हवा असेल तर साधनेची आवश्यकता असते हा विचार वक्त्यांनी शिबिरार्थीना दिला.
समारोपाच्या सत्रात डॉ. अडाटीया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते; त्यांनी अपूर्ण जीवन आपणास निराश करतं. वैराग्यही सोपी गोष्ट नाही. ‘स्व’ चा शोध घेण्याच्या जिज्ञासेतून आनंद प्राप्ती होते असे सारभूत विचार मांडले. या शिबिरामामध्ये १०९ शिबिरार्थींनी सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांनी शिबिरात सहभाग घेतला तर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी शिबिराचे समन्वयक म्हणून भूमिका बजावली. मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.