(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हा स्नेह मेळावा कास्ट्राईब संघटनेचे धडाडीचे व अभ्यासू राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या उल्लेखनीय उपस्थित अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिरादार उपस्थित होते. यावेळी संघटनेचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष प्रज्ञावंत बाजीराव, माजी राज्य उपाध्यक्ष मिलिंदराव कदम, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, रत्नागिरी जिल्हा सचिव सुधाकर कांबळे, कार्याध्यक्ष प्रदीप पवार, कोषाध्यक्ष,संतोष पवार, पतपेढीचे संचालक हिरालाल चावरे, संचालक बिपीन मोहिते, संचालक विलास शिंदे यांसह जिल्हा व तालुका संघटनेतील सर्व पदाधिकारी, सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रवीण बिराजदार म्हणाले की, संघटनेचा प्रत्येक सदस्य हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. प्रत्येक सभासद हा कार्यक्षम असणे हिच संघटनेची मोठी ताकद असते. आपल्या कतृत्वाने जनसंपर्क वाढवला पाहिजे,प्रत्येक व्यक्तीने मोठ- मोठी स्वप्न पाहण्यापेक्षा मोठ्या स्वप्नांचे लहान लहान तुकडे करून ती छोटी छोटी स्वप्न वेळ न घालवता लगेच पूर्ण करत चला. छोटी छोटी स्वप्न पूर्ण करत असतानाच मोठ-मोठी स्वप्न आपोआप पूर्ण होत असतात.आपल्या कृतीचा परिणाम हा इतरांवर सकारात्मक झाला पाहिजे, अशी सकारात्मक कृती, वर्तन प्रत्येकाचे झाले तर संघटना असो वा समाज हा प्रगतीचा मार्ग साधल्याशिवाय राहणार नाही.
पुढे बोलताना प्रविण बिरादार म्हणाले की, मानवी जीवनाची समृद्धीकडे वाटचाल करताना या देशातील प्रबोधन काळ कायम लक्षात ठेवला पाहिजे. शिक्षक संघटनांचे महत्त्व ध्यानात घेऊन संघटित राहण्याचे त्यांनी आवाहन केले.राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले की, शिक्षकांच्या समस्या – अडचणी हे संघटनेच्या वतीने वेळोवेळी पूर्णत्वास नेल्या जातात, मात्र या संघटनेच्या मेळाव्याच्या रूपाने आपण महामानवांचे विचार पुढे नेण्यासाठी असे जिल्हा व तालुके मेळावे घेणे अनिवार्य असल्याचे सांगून त्यांनी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे आणि जिल्हा कमिटी तसेच तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, संघटनेचे कार्यकर्ते, सभासद यांनी हा स्नेहमेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न केल्याबद्दल सर्वांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी कु.तापेकर, चित्रा कांबळे, मिलिंदराव कदम, गौतम वर्धन, बाजीराव प्रज्ञावंत यांनी संघटने संदर्भात आपले प्रभावी विचार व्यक्त केले. या मेळाव्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार यांसह अनेक आदर्श महापुरुष यांच्या नावे गुणवंत- यशवंत, कर्तबगार शिक्षक -शिक्षिका व समाजातील मान्यवर स्त्री पुरुष यांना संघटनेच्या वतीने मान्यवर मंडळींच्या हस्ते विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघटनेतील सभासद व पदाधिकारी यांनी उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी केले. ओघवते सूत्रसंचलन परवेझ टेमकर आणि तालुका सचिव अनिल चव्हाण यांनी यशस्वीपणे केले. या मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागातील देखील कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते. स्नेहभोजनाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली. यावेळी मेळाव्यात जिल्हा एस टी सेल म्हणून श्री.कुणाल तडवी यांची नियुक्त पत्र देऊन त्यांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले.तसेच रत्नागिरी तालुका अध्यक्ष म्हणून श्री.उमेश तायडे यांची नियुक्ती करण्यात आली. रत्नागिरी तालुका संघटनेचे सचिव अनिल चव्हाण यांनी आभार मानले.