(रत्नागिरी)
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीची (01101) अमरावती येथून 6 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि ती कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील वीर स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. अमरावती आणि वीर दरम्यान 6 फेब्रुवारी 2025 रोजी अनारक्षित विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून वीर स्थानकापर्यंत धावणारी ही पहिलीच विशेष गाडी आहे.
ही अनारक्षित गाडी परतीच्या प्रवासाला 11 फेब्रुवारी रोजी निघेल. वीर ते अमरावती मार्गावर गाडी (01102) वीर येथून रात्री 10 वाजता सुटेल आणि 12 फेब्रुवारी 2025 रोजी ती अमरावतीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. जनरल श्रेणीचे 16 आणि एसएलआर दोन अशा एकूण 18 डब्यांची ही गाडी असणार आहे.
7 फेब्रुवारी रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची जयंती साजरी केली जाते. माता रमाई यांचे माहेरघर दापोली तालुक्यातील वणंद येथे आहे. त्याचप्रमाणे, मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असून, त्याठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक आहे.