(पुणे /प्रतिनिधी)
परमपूज्य सद्गुरु श्री पप्पाजी पुराणिक महाराज यांनी स्थापन केलेल्या ओम जय शंकर प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे पुण्यातील हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथे रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी परब्रह्म भगवान श्री शंकर महाराजांच्या भक्तांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर रोडवरील कोरेगाव मूळ (उरळी कांचन) येथील यशोदा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण दिवसभर बहुविध उपक्रम आणि सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी हा मेळावा होत असल्याने शंकर भक्तांमध्ये अपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दि.२७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी दीप प्रज्वलन आणि ध्वजारोहणाने मेळाव्याला प्रारंभ होईल. त्यानंतर दत्तयाग,अभिषेक याही सेवा पार पडतील.
शंकर गीता ग्रंथाचे पारायण आणि इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन
सद्गुरु श्री पुराणिक महाराज यांनी या मेळाव्याची माहिती देताना सांगितले की, सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत भक्तांना प्रिय असलेल्या आणि तात्काळ अनुभूती देणाऱ्या श्री शंकर गीता या दिव्य ग्रंथाचे सामुदायिक पारायण घेतले जाणार आहे. तर सायंकाळी चार वाजता शंकर गीता या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन केले जाईल. त्यामुळे विदेशातील भक्तांनाही शंकर गीता या ग्रंथाचे पारायण करता येणे सोपे जाईल असे सद्गुरु श्री पुराणिक यांनी नमूद केले.
सद्गुरु राजाभाऊ कोठारी यांचे प्रवचन
या मेळाव्यात सद्गुरु विश्वेश्वर महाराज तथा सद्गुरु राजाभाऊ कोठारी यांचे दुपारी दोन ते चार या वेळेत प्रवचन होईल. दिवसभर असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. तरी श्री शंकर महाराज भक्तांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ओम जय शंकर प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून परब्रह्म भगवान श्री शंकर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य सद्गुरु पप्पाजी पुराणिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमी. या तिथीला पावन करीत इ.स.१७८५ साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त श्री.नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच ‘शंकर’ नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत. शंकर महाराजांचा मोठा अनुयायी वर्ग आहे आणि हा वर्ग त्यांच्या विचारांचे पालन करत अध्यात्माची वाट चालत आहे.
“मैं कैलास का रहनेवाला हूं ।” असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज देखील त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. सद्गुरु श्री शंकर महाराज काहीही लीला करू शकत असत.