(देवरूख / सुरेश सप्रे)
वयाच्या 15 व्या वर्षी मी राजकारणात आलो. हिंदुत्व व मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे काम मी केले. याचा मला अभिमान वाटतो. बाळासाहेब मुळेच अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली असे खास. नारायणराव राणे यांनी सांगत कोणीही आपले कौतुक केले तर लगेच भारावून जाऊ नये. प्रथम आत्मपरीक्षण करून आपण त्या कौतुकास पात्र आहोत का, याचा विचार करावा. आज मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आहे. या संख्येवरूनच माझे काम आणि माझ्यावरील प्रेम दिसते, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले.
देवरुख मराठा भवन येथे भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्याच्यावतीने आज खासदार नारायण राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार निलेश राणे, माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, प्रमोद जठार, राजेंद्र महाडिक, सौ.निलम राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रामदास राणे क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, सदानंद भागवत, भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, अभिजित शेट्ये, अभिजित सप्रे, निलेश भुरवणे, आदिसह महायुतीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. राणे म्हणाले की, कोकणात उद्योग-धंदे येतील, मात्र त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण कोकणातील मुलांनी घ्यायला हवे आणि तरच इथली पदे इथेच भरतील. कष्ट करण्यासाठी लाज न बाळगता कोकणच्या मराठी माणसाने काम केले पाहिजे. मराठी माणसाची उद्योग-धंद्यात काम करण्याची टक्केवारी वाढली पाहिजे, तरच समृद्ध असे कोकण घडेल आणि देशाच्या नकाशात समृद्ध कोकण असे स्पष्ट दिसेल. कोकणच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी मी केव्हाही हजर असेन. चरस, गांजा यांसारख्या गोष्टी जे तरुण पिढीला वाया घालवत आहेत, त्या आता बंद झाल्या पाहिजेत, यावर देखील आपण कठोर पावले उचलणार आहोत असेही राणे म्हणाले.
गेली 50 ते 55 वर्षे कोकणी माणसाच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे नारायण राणे हेच असे सांगून नारायण राणे म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तसेच कोकणात त्यांचा दबदबा आहे, असे गौरवोद्गार माजी आम. प्रमोद जठार यांनी व्यक्त केले
राणे साहेबांच्या मनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हावी अशी शुभेच्छा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देत राणे साहेब म्हणजे विरोधकांना आपलंस करणारे व्यक्तिमत्व होय. संघर्ष हा त्यांच्याकडून शिकला पाहिजे. आज कोकणात अनेक उद्योग येत आहेत. यामध्ये आपल्या जिल्ह्यातीलच मुले लागली पाहिजेत असा संकल्प आज राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने करूया असे शेवटी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.