(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील विकासकामांबाबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना गणपतीपुळे गावातील जागरूक ग्रामस्थ चंद्रकांत गजानन ठावरे यांनी लेखी निवेदन दिले आहे. “गणपतीपुळे गावाचा विकास की कॉन्ट्रॅक्टरचा विकास” अशा आशयाचे हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना त्यांनी म्हटले आहे की, गणपतीपुळे येथे ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. पूर्ण गावाच्या ड्रेनेजसाठी सहा इंच पाईप लाईन, आपण घरासाठी चार इंच लावतो. जे रस्त्यात चेंबर खणले आहेत ते रस्ता लेवलच्या वरती तीन-चार इंच आहेत. चार चाकी गाड्यांच्या सस्पेंशनची वाट लागते. टू व्हीलर तर सीसॉ चा आनंद घेत असल्याचे वाटते. येथे अपघाताची तर मालिकाच आहे. महावितरण यांनी साईडपट्टी खोदून वरवर माती आणली आहे. साईडपट्टी जवळचे रिप्लेक्टर काढून टाकून पूर्ण रस्त्याची वाट लावली आहे.
गणपतीपुळे येथे ड्रेनेजचे काम करणारे ठेकेदार गौरव रहाटे यांच्याशी संपर्क केला असता, आमची बिले मिळाली नाहीत त्यामुळे तुम्ही ऑफिसशी संपर्क करा असे सांगितले. अत्यंत निकृष्ट काम करावयाचे, विकासाच्या नावाखाली आलेले पैसे घ्यायचे आणि ऑफिसकडे बोट दाखवायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे. गणपतीपुळे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे, म्हणून आपली पाठ थोपटायची, परंतु वास्तव काय आहे? गेली तीन-चार वर्षे ड्रेनेजची दुरावस्था, पाण्याची पुरवठा करणारी अर्धवट कामे, त्यासाठी खणलेले रस्ते, महावितरणची अंडरग्राउंड वीज पुरवठा करणार म्हणून खोदलेल्या साईडपट्ट्या, सर्व गाव यामुळे त्रस्त आहे. गणपतीपुळे ग्रामपंचायत काय करत आहे? त्यांना विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे दिली जातात. गावाचा स्वाभिमान नसला की असे होते. सर्व गावाची वाट लागली आहे. राजकारण आणि अर्थकारण यात मग्न आहेत. लोक सुद्धा याला कंटाळले आहेत. ग्रामपंचायतची पूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या वीज पुरवठ्यासाठी वायर टाकल्या आहेत त्या वणव्यात जळाल्या आहेत. त्या नुकसानीला जबाबदार कोण? विकासाच्या नावाखाली आलेला कोट्यावधीचा निधी कुठे जातो? निकृष्ट कामे करणाऱ्यांवर देखरेख नाही. सर्व लोकप्रतिनिधी काय करतात ?त्यांच्या वागण्याचा अर्थ काय? की, अर्थच पाहतात ? याबाबत ड्रेनेज, महावितरण, पाणीपुरवठा याबाबत होत असलेली कामे आणि त्यांचे साहित्य अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. ग्रामस्थ आणि पर्यटक यांना होत असलेला त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. आपण याबाबत चौकशी करून योग्य ती माहिती द्यावी, मी आणि गणपतीपुळे गावाबाबत आस्था असणारे ग्रामस्थ आमरण उपोषण करण्याच्या विचारांवर ठाम आहोत. आपल्याकडून सकारात्मक आणि साचेबंद नसलेल्या उत्तराची वाट पाहत आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय बिले निघू नयेत, असे निवेदनात चंद्रकांत ठावरे यांनी म्हटले आहे.