(रत्नागिरी)
कोकण किनारपट्टीवर कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी प्रथम गुहागर समुद्रकिनारी आढळून आलेले पहिले घरटे संरक्षित करण्यात आले होते. ही पिल्ले आता समुद्राकडे झेपावली असून कासवमित्रांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांनी अंडी घालण्यासाठी सुरुवात केली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात. समुद्री कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या कोकणात अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटीदेखील सापडली आहेत.
महाराष्ट्रातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी २९८ घरटी आढळून आली होती. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामातील पहिले घरटे १५ नोव्हेंबर रोजी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आले होते. त्यामधील अंड्यांना कासवमित्रांनी संरक्षित केले होते.
गुहागरच्या किनाऱ्यावर बाग, वरचा पाट आणि खालचा याठिकाणी समुद्री कासवांसाठी हॅचरी तयार करण्यात आल्या आहेत. या किनाऱ्यावर सात कासवमित्रांकडून संरक्षणाचे काम केले जाते. समुद्री कासवाच्या मादीने किनाऱ्यावर खड्डा करुन त्यामध्ये टाकलेली अंडी ही कासवमित्रांकडून हॅचरीमध्ये संरक्षित करण्यात येतात. अशाच प्रकारे संरक्षित केलेल्या घरट्यामधून २७ पिल्ले बाहेर पडली. जी कासवमित्रांनी सुखरुपरित्या समुद्रात सोडली. कासवांच्या अंडी उबवणीचा काळ हा ५० ते ६० दिवसांचा असतो. उबवणीची प्रक्रिया बाहेरील तापमानावर अवलंबून असते.
कांदळवन कक्षाकडे धुरा
यापूर्वी कासव संवर्धनाच्या कामाचे नियोजन हे वन विभागाच्या प्रादेशिक विभागाकडून केले जात होते. यामध्ये हॅचरीसाठीचे सामान पुरवणे, कासवमित्रांचे मानधन, कासवमित्रांसाठी कार्यशाळांचे आयोजन अशा कामांचा समावेश होता, मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा पुरवठा हा कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठानाकडून केला जात होता. म्हणजे प्रादेशिक वन विभागाकडून कांदळवन कक्षाकडे आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी केली जात होती, मात्र यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाची संपूर्ण जबबादारी कांदळवन कक्षाने स्वीकारली आहे. कांदळवन कक्षांतर्गत उत्तर आणि दक्षिण कोकण असे दोन विभाग झाल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासव संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी ही दक्षिण कोकण विभागाची असणार आहे.