(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारताच्या संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद राज्यभरासह देशभर उमटत आहेत. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वपक्षीय आंबेडकरवादी विचाराच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवारी, दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सिव्हिल हॉस्पिटल शेजारी येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व पक्षीय आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीचे अध्यक्ष स्थान एल. व्ही. पवार यांनी भूषविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत जाहीर अपमान करणाऱ्या अमित शहा यांनी तात्काळ गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. अमित शहा यांनी भारताचे निर्माते, ज्यांनी तमाम भारतीय नागरिकांना मनुस्मृतीच्या नरकातून बाहेर काढून लोकशाहीच्या सर्वांग सुंदर स्वर्गात आणले. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान केला नाही तर प्रत्येक लोकशाहीवादी, समतावादी भारतीयाच्या अस्मितेचा अपमान केलेला आहे. या विरोधात दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी येथे मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा तथा निदर्शने यांचे आयोजन केले आहे. या निषेध मोर्चात रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वपक्षीय आंबेडकरवादी प्रत्येक घरामधील लहान थोर व्यक्तींनी आपल्या राष्ट्र निर्मात्या बापाच्या अपमानाचा बदला घेण्याकरिता स्वयंप्रेरणेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लोकशाही वाचविण्यास योगदान द्यावे असे आवाहन सर्व पक्षीय आंबेडकरवादी आयोजक नेते यांचेकडून करण्यात आले आहे.
या बैठकीस एल. व्ही. पवार, राजन आयरे, दिपक राऊत, मा. बी. के. पालकर, बशीर मुर्तुजा, अशोक भाटकर, काका तोडणकर, सईद पावसकर, सुधाकर सावंत, शिवराम कदम, मिलिंद नार्वेकर, प्रदीप भिकाजी पवार, प्रकाश यशवंत पवार, रुपेश चवंडे, शरद मोहिते आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.