(विशेष प्रतिनिधी / रत्नागिरी)
जिल्ह्यातील (ता. संगमेश्वर) धामणी येथील ३४ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदीपात्राजवळ एका झुडपात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सापडला. या घटनेला १ महिना, १५ दिवस उलटले तरीही अद्याप हत्या की आत्महत्या, याचे कोडे उलगडलेले नाही. तसेच प्रशांतचा मृतुदेह सापडल्यानंतर त्याचा व्हीसेरा अहवालासाठी कोल्हापूरकडे पाठवण्यात आला. तो अहवालही अद्याप प्राप्त झाला नसल्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पवार कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्ये रोष निर्माण होत असून नेमकं या प्रकरणात सुरू काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मृत प्रशांत पवार याचा झुडपात मृतदेह सापडला त्यावेळींपासून आजपर्यंत पवार कुटुंबीय प्रशांतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत आहे. प्रशांतला मारहाण, जीवघेणे हल्ल्याचे प्रयत्न त्याच्याच चुलत भावाकडून झाले होते. चुलत भावाविरोधात वेळोवेळी संगमेश्वर पोलीस स्थानकात मृत प्रशांतने तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु पोलीसांकडून न्याय मिळेल या उद्देशाने जगणाऱ्या प्रशांतचाही अखेर मृत्यू झाला. या मृत्यूचे अजूनही गूढ उकलेलं नाही. मृतदेह सापडल्यानंतरही पोलिसांना निवेदने देखील कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहेत. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा अधीक्षकांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला होता. यावेळी पदाधिकाऱ्यांनी संशयित आरोपींना तत्काळ जेरबंद करण्याबाबत निवेदन देखील सादर केले होते. मृतदेह हा गावातच आठ दिवसानंतर सापडतो याचा अर्थ काय? पोलीस प्रशासन त्या आठ दिवसात कोणताही तपास करताना दिसले नाहीत ही कुटुंबाची खंत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केली आहे.
संगमेश्वर पोलिसांची भूमिका संशयास्पद; ब्रीद वाक्याचा विसर
प्रशांतचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. प्रशांत मच्छीच्या गाडीवर जातो असे सांगून ज्यावेळेस घराबाहेर पडला त्यांनंतर वडिलांनी सवयीप्रमाणे त्याला फोन केला. त्याच्या फोनवर रींग सुरू होत्या. त्यानंतर पंधरा मिनिटांनी वडिलांनी पुन्हा फोन केला, त्यावेळेस प्रशांतचा मोबाईल स्विच ऑफ लागला तो कायम आहे, असेही वडीलांसह नातेवाईक सांगतात. पोलिसांना प्रशांतचा मृतदेह काही दिवसांनी सापडला मात्र मोबाईल अजूनही सापडत नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणात आणखी वेगवेगळी माहितीही पुढे येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे. परंतु कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस प्रशासनाची भूमिका या प्रकरणात संशयास्पद दिसून येत आहे. हे प्रकरण घडल्यानंतर संगमेश्वर पोलिसांवर अनेक प्रश्न उभे राहिले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ सर्व सामान्य जनतेला पूरेपुर माहित आहे. मात्र संगमेश्वर पोलीस निरीक्षकांना या ब्रीद वाक्याचा विसर पडला आहे का ?
पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन
संगमेश्वर पोलिसांना अद्यापही या प्रकरणाच्या मुळाशी जाता आलेले नाही. प्रशांतचा मृतुदेह सापडून १ महिना, १५ दिवस उलटले मात्र अद्यापही तपासिक पोलीस अधिकाऱ्यांना ठोस धागेदोरे का सापडत नाहीत. तसेच व्हीसेरा अहवालही पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालाचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. पोलिसांकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून हे संपूर्ण प्रकरण दडपवण्याचा प्रयत्नच एकप्रकारे सुरू आहे का? असा थेट प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच या प्रकरणात संगमेश्वर पोलिसांच्या आतापर्यंतच्या भुमिकेवरून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. तर पोलीस प्रशासन अन्याय करण्याच्या भूमिकेत आहे की न्याय देण्याच्या प्रक्रियेत आहे? असा देखील संतप्त सवाल उपस्थित होऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.