(संगमेश्वर /एजाज पटेल)
शांत व ग्रामीण वातावरणासाठी ओळखला जाणारा डिंगणी परिसर सध्या भीतीच्या छायेत वावरत आहे. काही दिवसांपूर्वी येथे गवेरेड्यांचा मुक्त संचार सुरू असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. शेतजमिनी, रानमळे आणि काही ठिकाणी मानवी वस्तीजवळही गवेरेडे वावरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये सुरुवातीपासूनच अस्वस्थता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होण्याची भीती तर होतीच; पण अचानक समोर येणाऱ्या या रानटी जनावरांमुळे जीवितासही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
गवेरेड्यांच्या या वावरामुळे डिंगणी परिसर आधीच धास्तावलेला असतानाच आता बिबट्याच्या दर्शनाच्या चर्चेने वातावरण अधिकच तापले आहे. डिंगणी – शास्त्रीपूल – आंबेड या मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी दिवसाढवळ्या बिबट्या रस्ता ओलांडताना पाहिल्याचा दावा केला आहे. या चर्चेमुळे सोशल मीडियावर आणि गावोगावी भीतीची चर्चा रंगू लागली होती. “रात्री काय, आता तर दिवसादेखील रस्त्यावर सुरक्षितता उरली नाही,” अशी चर्चाही जोरात सुरु होती.
दरम्यान, या चर्चेला दुजोरा देणारी धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. डिंगणी मोहल्ला परिसरातील तुरळक रानात एका गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याचे समोर आले आहे. भक्ष्याच्या शोधार्थ वस्तीच्या जवळपर्यंत येऊन बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी वासराचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
ही घटना उघड झाल्यानंतर नागरिकांची भीती अधिकच वाढली आहे. “आधी गवेरेडे, आता बिबट्या; आम्ही घराबाहेर पडायचे कसे?” असा प्रश्न महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळकरी मुले, शेतकरी आणि दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणारे कामगार यांच्यातही भीतीचे वातावरण आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी डिंगणी मुख्य रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक आता धास्तावले आहेत. काहींनी रात्रीची वाहतूक टाळण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यालगत झाडी असल्याने अचानक बिबट्या समोर येईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बिबट्याचा ठावठिकाणा शोधून त्याला सुरक्षितरीत्या पकडावे किंवा जंगलाच्या दिशेने हुसकावून लावावे, अशी मागणी होत आहे. तसेच गवेरेड्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठीही ठोस उपाययोजना कराव्यात, असे मत व्यक्त होत आहे.
एकीकडे गवेरेड्यांचा मुक्त संचार आणि दुसरीकडे बिबट्याचा वस्तीपर्यंत झालेला प्रवेश यामुळे डिंगणी परिसरात दुहेरी भीतीचे सावट गडद झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आणल्यास आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

