( मुंबई )
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्रमक शैलीतील भाषण करत विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. “भारतीय जनता पक्षाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर 16 तारखेला येणारी सकाळ आमचीच असेल,” असा ठाम इशारा त्यांनी यावेळी दिला.
नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाला भडकवणे आणि मतांमध्ये फूट पाडण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका हिंदू समाजालाच बसत आहे. त्यांनी मुंबईतील हिंदू लोकसंख्या सातत्याने घटत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मतदारांनी भावनिक आवाहनांपेक्षा उमेदवारांची पात्रता, त्यांची ताकद आणि विकासकामांचा आढावा घेऊन मतदान करावे, असे आवाहन केले.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कामगिरीचे कौतुक करत राणे म्हणाले की, मुंबईतील अनेक महत्त्वाच्या विकासविषयक निर्णयांमध्ये दरेकर यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. “कोणी विकासाच्या नावावर मत मागायला आला, तर त्याला स्पष्ट सांगा की राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचाच आहे,” असेही त्यांनी मतदारांना सांगितले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. “आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालो आहोत. आम्ही कोणतेही “चायनीज शिवसैनिक” नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार अंगावर आले, तर शिंगावर घेण्याची आमची परंपरा आहे,” असे ते म्हणाले.
उत्तर भारतीयांनाही त्यांनी स्पष्ट संदेश दिला. “मुंबईच्या विकासावर बोलायचे असेल, तर आधी मराठी भाषा शिका. मराठीचा सन्मान ठेवा, त्यानंतरच मुंबईच्या विकासावर बोला,” असे राणे म्हणाले.
मुंबईच्या विकासावर चर्चा करताना त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आणि संजय राऊत व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीवरही निशाणा साधला. “ही मुलाखत विकासाची नव्हती, तर फिक्सिंगची होती. महेश मांजरेकर हे साडेसातनंतर बसणारे अभिनेते आहेत, तर संजय राऊतांना ठाकरे बंधूंशिवाय दुसरे कोणतेही काम नाही,” असा आरोप त्यांनी केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना बाजूला ठेवून केवळ अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मूळ विचार सोडले.”
एकूणच, नितेश राणे यांच्या या आक्रमक भाषणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप अधिक आक्रमक भूमिकेत उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

