(रत्नागिरी-चिपळूण/ प्रतिनिधी)
‘टीडब्ल्यूजे’ या गुंतवणूक संस्थेचा संचालक राज्यातील शेकडो पोलिसांनी गुंतवणूक केल्याचा दावा करताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ फार पूर्वीचा असून सध्या प्रसारित होत असलेला मजकूर दिशाभूल करणारा आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. तसेच संस्थेचा संचालक समीर नार्वेकर याच्या शोधासाठी चार जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणा सक्रिय असून, लवकरच तो पोलिसांच्या तावडीत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हायटेक टीडब्ल्यूजे या संस्थेने चिपळूणमध्ये कार्यालय सुरू करून सुरुवातीला आकर्षक योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भुलवले. कमी कालावधीत दामदुप्पट परतावा, विविध लाभांचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गोळा करण्यात आली. प्रारंभी काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावाही देण्यात आल्याने अल्पावधीतच ‘टीडब्ल्यूजे’ची चिपळूणमध्ये लोकप्रियता वाढली. मात्र, त्यानंतर अचानक लाभ देण्यात दिरंगाई होऊ लागली. संचालक संपर्काबाहेर राहू लागल्याने गुंतवणूकदारांना फसवणुकीची जाणीव झाली आणि पोलिस ठाण्यात तक्रारींचा ओघ सुरू झाला.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी संतप्त गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलीस ठाण्यावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. काहींनी आत्मदहनाचा इशाराही दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्याच दरम्यान सोशल मीडियावर संचालकाचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, सदर व्हिडीओ जुना असून त्याची खातरजमा करण्यात आली आहे. संचालक समीर नार्वेकर हा सध्या फरार असून, तो जिल्ह्याबाहेर गेल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने चार जिल्ह्यांतील पोलीस त्याच्या शोधात असून, तपास वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्हिडीओमध्ये काय दावा?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये संचालकाने टीडब्ल्यूजे संस्थेत सुमारे ११ हजार गुंतवणूकदार असून, त्यापैकी राज्यातील शेकडो पोलिस गुंतवणूकदार असल्याचा दावा केला आहे. चिपळूण पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारीही आपले गुंतवणूकदार असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, या दाव्यांचा सध्याच्या तपासाशी थेट संबंध नसून, व्हिडीओ जुन्या कालावधीतील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांच्या तक्रारींवरून सुरू असलेल्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, फरार संचालकाच्या अटकेनंतर या प्रकरणाचे नेमके सत्य उघड होणार आहे.

