(दापोली / वार्ताहर)
कोकणातील ग्रामीण भागातील प्रश्नांना नेहमीच परखडपणे न्याय देणारे, धडाडीचे आणि निःपक्षपाती पत्रकार म्हणून ओळखले जाणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे. कोकणाच्या मातीशी नाळ जुळवून, तळागाळातील जनतेची वेदना, प्रश्न, संघर्ष आणि विकासाची गरज सातत्याने जनतेपुढे आणणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी काम केलं आहे. त्यांच्या कार्याची व्यापकता, धडाडी आणि निःपक्षपाती भूमिका लक्षात घेऊन त्यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे.
गेल्या आठ वर्षांमध्ये तेजस बोरघरे यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख माध्यमसंस्थांमध्ये कार्य करताना स्वतःचे वेगळेपण जपले आहे.
त्यांनी लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाही, जय महाराष्ट्र या प्रतिष्ठित न्यूज नेटवर्कमध्ये काम केल्यानंतर सध्या ते पुढारी न्यूजमध्येही कार्यरत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ते कोकण कट्टा न्यूजचे संपादक म्हणून काम पाहत असून या माध्यमातून त्यांनी कोकणातील तळागाळातील समस्या प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या आहेत. परंतु त्यांच्या पत्रकारितेची खरी ओळख निर्माण झाली ती ग्रामीण भागातील समस्यांना प्राधान्याने हाताळणाऱ्या, परखड आणि जनसामान्यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या वार्तांकनातून. हा सन्मान कुणबी महोत्सवातर्फे सुहास खंडागळे (संघटन प्रमुख) आणि उदय गोताड यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. कोकणातील पत्रकारितेतील तळागाळापर्यंत पोहोचलेल्या कामाची दखल घेणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भूमिका घेण्याचा ध्यास घेतलेल्या तेजस बोरघरे यांनी अनेक स्थानिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी, ग्रामीण भागातील मूलभूत समस्या यांना नेहमीच आवाज दिला. त्यांच्या प्रभावी वार्तांकनामुळे अनेक वेळा प्रशासनालाही तातडीने लक्ष घालावे लागले आहे. कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून अनेक सामाजिक बातम्यांचा ठोस इम्पॅक्ट झाला असल्याचेही निदर्शनास आले आहे.
संपादक नव्हे, तर कोकणाच्या प्रश्नांचा अभिव्यक्तिदाता
तेजस बोरघरे यांचे काम फक्त बातम्या देण्यापुरते मर्यादित नाही;
ते सामाजिक भूमिका घेतात, भूमिपुत्रांसाठी आवाज उठवतात आणि कोकणातील सर्वसामान्यांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणतात.
या प्रवासात त्यांचे सहकारी जाहीद मुजावर सलीम रखांगे आणि कोकण कट्टा न्यूजची सर्व टीमचेही मोलाचे योगदान राहिले आहे.
तळागाळातील लोकांच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य कोकण कट्टा न्यूज सतत करत आहे. या चॅनेलने कोकणातील दुर्लक्षित, दाबल्या गेलेल्या, प्रशासनापर्यंत पोहोचू न शकलेल्या अनेक प्रश्नांना प्रकाशात आणले आहे.
पुरस्कार सोहळा १३ व १४ डिसेंबर रोजी, करंबेळे तर्फे देवळे, गोताडवाडी, ता. संगमेश्वर, येथे आयोजित कुणबी महोत्सवादरम्यान संपन्न होणार आहे. हा महोत्सव रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला दिशा देणारा उपक्रम म्हणून ओळखला जातो.

