(रत्नागिरी)
संविधानाने आपल्याला दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रत्येक नागरिकाने मनापासून आत्मसात करायला हव्यात. नव्या पिढीपर्यंत, विशेषत: विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत या मूल्यांची पोहोच होणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संविधान दिनानिमित्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत आणि उद्देशिकेची प्रतिमा प्रदान केली.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. जिल्हाधिकारी जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून भारताच्या संविधान मूल्यांप्रति निष्ठा व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
संविधान दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या सोबत सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही बाबासाहेबांना विनम्र आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, वरिष्ठ सहाय्यक यू. एम. आष्टुरे, तालुका समन्वयक अमोल पाटील, कनिष्ठ सहाय्यक रितेश सोनवणे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

