(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळांवर एकाच वेळी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी, २९ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.३० ते ९.३० या वेळेत घडली.
मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव दत्ता बिरा यमगर (वय ३४) असे आहे. ते मूळचे सांगोला, सोलापूर येथील असून सध्या रत्नागिरीतील कुवारबाव येथे वास्तव्यास होते. दुसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
रेल्वे रुळांवर हे मृतदेह दिसताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांवरून रेल्वे गेल्याचे स्पष्ट असून, एका मृताचे डोके धडावेगळे झाल्याचे आढळून आले. या माहितीची तात्काळ कल्पना ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेची नोंद ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.