( मुंबई )
राज्य मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि प्रशासकीय क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारे पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. “हे निर्णय सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करूनच घेतले असून, राज्याच्या विकासाला गती देणे हा उद्देश आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर सांगितले.
मंत्रिमंडळाचे पाच प्रमुख निर्णय :
1. कॅन्सर उपचार धोरण व ‘महाकेअर फाऊंडेशन’
– कर्करोग उपचारासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक धोरण निश्चित केले.
– त्रिस्तरीय समग्र सेवा राबवली जाणार असून राज्यातील १८ रुग्णालयांत विशेषोपचार उपलब्ध होणार.
– यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (MAHACARE Foundation) स्थापन होईल.
– भागभांडवलासाठी १०० कोटींचा निधी मंजूर.
2. जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५
– ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरणाला मंजुरी.
– विकसित भारत २०४७ या ध्येयाशी सुसंगत गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन.
3. वीज विक्री कर वाढ
– औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी.
– यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-बी व अन्य योजनांतर्गत सौर कृषीपंपासाठी निधी उपलब्ध होईल.
4. ‘महाजिओटेक महामंडळ’ची स्थापना
– भू-स्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology) वापरून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्णय.
– धोरणात्मक नियोजन व निर्णयप्रक्रियेत या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार.
5. फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
– सातारा जिल्ह्यातील फलटण येथे नवीन न्यायालयाची स्थापना.
– आवश्यक पदे व खर्चासाठी मंजुरी.

