(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे. या काळात दर दिवशी सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत देवीसमोर प्रवचन व भक्तिगायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
या वेळेत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येते. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी थांबावे लागते. मात्र ही प्रथा आणि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या वेळेत फक्त मुखदर्शन सुरू असते.
नवरात्रोत्सवाच्या काळात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह राज्यभरातून आणि शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेकांना ही वेळ माहित नसल्याने त्यांच्या मनात नाराजी निर्माण होते.
भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान समितीने आवाहन केले आहे की सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत गाभाऱ्यातील दर्शन बंद असल्याची नोंद सर्वांनी घ्यावी.
भक्तांनी ही माहिती लक्षात घेऊन दर्शनाची वेळ नियोजित करावी, अशी नम्र विनंती देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

