(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील तिवरे पोस्ट ऑफिसमध्ये झालेल्या आर्थिक गैरप्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाखा डाकपालाने तब्बल १६ खातेदारांच्या विश्वासाला तडा देत दोन लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे पोस्ट ऑफिसमध्ये शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असलेला अमोल एकनाथ गोतावडे (२९, रा. गोतावडेवाडी) याने ९ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पदाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केली. त्याने ११ खातेदारांच्या बचत खात्यांवर बनावट अंगठे व सह्या करून तब्बल १ लाख ५१ हजार रुपये काढले. याशिवाय, दोन ग्राहकांकडून बचत खात्यासाठी मिळालेले ४० हजार रुपये स्वतःजवळ ठेवले. तर तिघा महिला खातेदारांच्या ठेव रकमेपैकी ३२ हजार ५०० रुपये जमा न करता अपहार केला. अशा प्रकारे गोतावडे याने एकूण २ लाख २३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोस्ट ऑफिस इन्स्पेक्टर योगेश प्रकाश जाधव यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर राजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१६ (५) व ३३६ (२) नुसार गुन्हा (क्र. १७३/२०२५) नोंदवला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून व्याजासह २ लाख ४२ हजार रुपये हस्तगत केले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील टपाल खात्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

