(खेड)
कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ‘जल फाउंडेशन – कोकण विभागा’ने येत्या २ ऑक्टोबर रोजी दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यावश्यक असलेल्या या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिला.
प्रवाशांची प्रमुख मागणी म्हणजे १९९६ पासून सुरू असलेली, मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या नावाखाली बंद करण्यात आलेली ५०१०३/५०१०४ रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी. या गाडीमुळे कोकणातील प्रवाशांना थेट मुंबई गाठणे सोयीचे होत असे. या व्यतिरिक्त मुंबई-चिपळूणदरम्यान नवी दैनिक गाडी सुरू करण्याचीही मागणी आहे.
नव्या गाडीत द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअरकार आणि सामान्य अनारक्षित डबे असावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, अंजनी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबावी. प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी मुंबईहून पहाटे लवकर सुटावी आणि चिपळूणहून दुपारी अथवा सायंकाळी परत यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. ‘नमो भारत’ किंवा ‘वंदे मेट्रो’सारख्या आधुनिक रेल्वेतून ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना अधिक सोयीस्कर ठरेल, असेही सूचित करण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून ‘जल फाउंडेशन’कडून मध्यरेल्वेला वारंवार पत्रव्यवहार करून मागण्या मांडल्या गेल्या; मात्र अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करणे आणि मुंबई-चिपळूणदरम्यान नवी गाडी देणे या दोन्ही उपाययोजनांमुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

