(रायगड)
रायगड जिल्ह्यात आत्महत्या आणि हत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन महिन्यांत २५ हत्यांच्या घटनांनी जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण केले असतानाच, अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे एका महिलेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिला अर्चना चंद्रकांत नाईक (वय 36) हिचा खून तिच्याच शेजारी राहणाऱ्या दत्ताराम नागू पिंगळा याने केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
जुने प्रेमसंबंध आणि सूडभावना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आणि आरोपी दत्ताराम यांच्यात काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र अर्चनाचे काका तुकाराम नाईक यांनी या संबंधांना विरोध केला आणि तिचा विवाह चंद्रकांत अशोक नाईक यांच्याशी लावून दिला. या विरोधामुळे चिडलेल्या दत्तारामने २८ मार्च २०१८ रोजी तुकाराम नाईक यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या तुकाराम यांचा ३१ मार्च २०१८ रोजी मृत्यू झाला होता.
खुनासाठी जन्मठेप… आणि नंतर जामिनावर सुटका
या खुनाप्रकरणी दत्ताराम पिंगळा याला अटक करून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये तो जामिनावर सुटला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्या मनात सूड भावना कायम होती. दरम्यान, १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता, दत्ताराम पिंगळा दिवीवाडी येथे आला आणि अर्चनाला भेटून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात वाद झाला, आणि त्यातून दत्तारामने दोरीच्या सहाय्याने अर्चनाचा गळा आवळून हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी दर्शना किशोर नाईक (वय 39) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून आत्महत्या व खुनांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. फक्त तीन महिन्यांत २५ हत्यांचे गुन्हे नोंद झाले असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांची यंत्रणा सतर्क असली तरी, वाढत्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्याच्या या घटना गंभीर असून, पुनरावृत्ती रोखण्यासाठी शासन आणि न्यायव्यवस्थेने कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

