(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणासह राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बँकेच्या कर्ला शाखेत तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तारण ठेवलेले सुमारे ५० तोळे (५०४.३४ ग्रॅम) सोने गायब झाल्याने बँक व्यवस्थापनासह ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकारी, शिपाई आणि कॅशियर या तिघांविरुद्ध संगनमत करून विश्वासघात आणि अपहार केल्याचा आरोप असून, शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शिपाई अमोल आत्माराम मोहिते याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ग्राहकांकडून सोने घेऊन त्यावर आधारित कर्जवाटप ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची नियमित पद्धत आहे. कर्जाची परतफेड झाल्यानंतर हे दागिने परत देण्यात येतात. मात्र, कर्ला शाखेच्या तिजोरीत ठेवलेले ५० लाखांचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचे अलीकडे उघड झाले. फिर्यादी सुधीर गिम्हवणेकर यांनी याबाबत २१ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीत किरण विठ्ठल बारये (शाखाधिकारी), अमोल आत्माराम मोहिते (शिपाई) आणि ओंकार अरविंद कोळवणकर (कॅशियर) या तिघांनी संगनमत करून सोन्याचा अपहार केल्याचे समोर येत आहे.
फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान घडला प्रकार
ही अफरातफर १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणारी ही घटना उघड होताच, बँक व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशी केली. मात्र कुणीही गुन्ह्याची कबुली न दिल्याने अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तारण सोन्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणी शहर पोलिसांनी कर्ला शाखेला भेट देत पंचनामा केला असून, बँक कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट्स व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. जिल्हाभरातील इतर शाखांमध्ये अशी अफरातफर झाली आहे का, याची चौकशीही करण्यात येत आहे. अलीकडेच लांजा येथील एका फायनान्स कंपनीमध्ये २६ लाख रुपयांची सोन्याची फसवणूक समोर आली होती. त्यातही कर्मचाऱ्यांनी तारण ठेवलेले दागिने बदलल्याचे निष्पन्न झाले होते. आता कर्ला शाखेतील ५० लाखांच्या सोन्याच्या अपहारामुळे तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

