(पुणे)
उत्तराखंडमधील गंगोत्रीजवळ धराली गावात मंगळवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर पुण्यातून गेलेल्या २४ पर्यटकांशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संपर्क साधून मदतकार्य वेगाने राबवण्याची विनंती केली होती. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातील सन १९९० च्या दहावीच्या बॅचचे हे २४ माजी विद्यार्थी पर्यटनासाठी उत्तराखंडला गेले आहेत. शुक्रवारी रात्री हे सर्वजण मुंबईला गेले आणि तिथून विमानाने उत्तराखंडला गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी जंगम या पर्यटकांपैकी एक असून त्यांचे बंधू म्हणाले, “२४ तासांहून अधिक काळ झाला, आम्ही काहीच संपर्क करू शकलो नाही. सर्वजण खूप चिंतेत आहोत.” सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियावरूनही या घटनेबाबत माहिती देत केंद्र आणि राज्य प्रशासनाला मदतीचं आवाहन केलं होते. शुक्रवार पासून या पर्यटकांच्या प्रत्येक घटनेचे अपडेट सोशल मीडियावरून मिळत होते. मात्र ढगफुटी झाल्यापासून कुणाचाही फोन लागत नसल्यामुळे आम्हाला चिंता वाटू लागली, अशी प्रतिक्रिया सहलीला गेलेल्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळपर्यंत १९० लोकांची सुटका करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारचे बचाव पथक युद्धपातळीवर कार्यरत आहेत. मात्र, चिखलाचे ढिगारे, ढासळलेले रस्ते आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पुण्याहून गेलेले हे सर्व २४ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेमुळे अवसरी खुर्द, मंचर येथील सुमारे २४ नागरिक अडकले असल्याचे समजले आहे. मागील २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गंगोत्री येथील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत.”
“ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मी स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री मा. पुष्कर सिंह धामी आणि उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ मदतीसाठी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व बचाव यंत्रणांशी सातत्याने संपर्कात राहून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका होईपर्यंत मी आणि माझी टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहोत”, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
पर्यटकांच्या नातेवाइकांसाठी हेल्पलाईन क्रमांक
▪︎ राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र:
📞 ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
▪︎ राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड:
📞 ०१३५-२७१०३३४ / ८२१