(गुहागर / रामदास गमरे)
“लाभ–आलाभ, यश–अपयश, निंदा–स्तुती, सुख–दुःख हे जीवनातील अपरिहार्य अनुभव आहेत. यांना अष्टधम्म असे म्हटले जाते. या अष्टधम्मांवर सजगतेने स्वार होऊन, त्यांच्या अनित्यतेचा बोध घेत संयम आणि समजूतदारपणाने वागणे हेच खरे लोकधम्माचे सार आहे. लोकधम्म ही केवळ तात्त्विक विचारधारा न राहता ती प्रत्यक्ष जीवनात वापरली गेली पाहिजे; तेव्हाच तिचा खरा उपयोग होतो,” असे प्रतिपादन गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र आणि पूर्व भिक्खू हेमंत रोहिणी अनंत पवार (अभिधम्मपाल) यांनी केले.
ते बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील तिसऱ्या पुष्पाच्या प्रसंगी बोलत होते. त्यांनी पाली भाषेतील अनेक गाथांचा मराठीत अनुवाद करून सोप्या उदाहरणांतून लोकधम्म संकल्पना स्पष्ट केली. “ध्यान, साधना, संयम आणि सजगतेद्वारे मन शांत व शुद्ध केले, तर खरा लोकधम्म साध्य होतो. अनित्य बोधाच्या आधारे सांसारिक परीक्षांचा सामना करणारा माणूसच संतत्व गाठतो आणि समाजाला मार्गदर्शक ठरतो,” असेही त्यांनी अधोरेखित केले.
संस्कार समिती आणि बौद्धजन सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत गावागावात व घराघरात धम्मप्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरे पुष्प विश्वस्त दीपक जाधव आणि परिवाराच्या शुभहस्ते, तर संघाचे अध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet द्वारे ऑनलाइन पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस संदेश गमरे आणि संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते यांनी प्रभावी व लाघवी भाषेत केले. अध्यक्ष दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर करून वर्षावास प्रवचन मालिकेचे महत्त्व उलगडून सांगितले.
या कार्यक्रमाला गाव व मुंबई शाखेतील बौद्ध उपासक–उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, तसेच दीपक मोहिते व परिवार, उपासक हेमंत पवार, शाखेचे आजी–माजी विश्वस्त व कार्यकारिणी, तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानून सचिन मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.