(पुणे)
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व स्थानिक निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रातील मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकत ‘आप’ने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता. विधानसभेसाठीही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीला साथ दिली होती. मात्र आता काँग्रेसचा ‘हात’ सोडत ‘आप’ने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, गट व गणपातळीवरील निवडणुका पक्षाने स्वतंत्रपणे लढवल्या होत्या.
“राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे राज्यात कुठेही ‘आप’चे उमेदवार उतरवले नव्हते,” असे मुकुंद किर्दत यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट मतदारसंघांतून उमेदवारीसाठी मागणी केली होती. तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये पक्षबांधणीस चालना मिळावी, यासाठी स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे किर्दत यांनी सांगितले.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून पक्ष कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि संघटनात्मक मजबुती साधावी, यासाठी स्वबळावर निवडणूक लढविणे हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.”
— मुकुंद किर्दत, प्रदेश प्रवक्ते, आम आदमी पक्ष