(संगमेश्वर)
तालुक्यातील ओझरखोल पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी (१७ जुलै) संध्याकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास एस.टी. बस आणि मिनीबसमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत सुमारे २० प्रवासी जखमी झाले. रस्त्यावरील अपुऱ्या कामामुळे सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीत एस.टी. चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आशिष प्रमोद विभते (वय ३८, रा. देवरुख, दत्तनगर, संगमेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मिनीबस (MH-08-AP-4527) ही चिपळूणहून रत्नागिरीच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या एस.टी. बसने (MH-20-BL-4038) रस्त्याच्या वळणावर कंटेनरला ओव्हरटेक करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसला जोरदार धडक दिली.
एस.टी. बसचा चालक अजय रामदास भालेराव (वय ४६, रा. चिपळूण) याने रस्त्याची धोकादायक स्थिती लक्षात न घेता वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत गाडीचा वेग कायम ठेवून कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून ही भीषण धडक घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, महामार्गावरील एकेरी वाहतुकीच्या अडचणी आणि वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.